जयपूर : कॉंग्रेसने राजस्थान येथील धौलपूर-भरतपूरच्या खासदार संजना जाटव यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविताना, मध्य प्रदेशचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. याबरोबरीने माजी मंत्री असलेल्या रेहाना रियाज यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन्ही महिला नेत्या या प्रियांका गांधी यांच्या जवळच्या असल्याने, त्यांच्यावर विश्वासाने ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी रात्री कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन्ही महिला नेत्यांना प्रभारी म्हणून नियुक्त केल्याचे आदेश दिले. खा. संजना जाटव या कॉंग्रेसमधील सर्वात तरुण महिला खासदार आहेत. संजना जाटव लोकसभेच्या खासदार झाल्या त्यावेळी त्या केवळ 25 वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच खासदार झालेल्या जाटव यांनी भाजपचे शैलेंद्र सिंग यांना जवळपास 60 हजारांच्या मताधिक्क्याने पराभूत केले होते. या विजयानंतर संजना जोपासत असलेल्या आपल्या नृत्यकलेची देखील राजकिय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. पहिल्यांदाच खासदार झालेल्या संजना जाटाव यांच्यावर गेल्या वर्षी देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना राजस्थान मधील जलसंपदा समितीच्या सदस्यपदी निवडण्यात आले होते. राजकारणात खा. संजना जाटव यांची प्रियांका गांधी व सचिन पायलट यांच्याशी असलेली जवळीक या जबाबदारीशी जोडण्यात येत आले.संजना यांचे वय लहान असताना व अनूभव देखील कमी असताना मिळाली आहे, त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे. खा. संजना जाटाव यांच्याबरोबरीने कॉंग्रेसच्या माजी मंत्री रेहाना रियाज यांच्यावर देखील मोठा विश्वास व्यक्त करताना महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. रेहाना रियाज चिश्ती यांनी गेहलोत सरकारमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावार देखील काम केले होते. याबरोबरीने त्या एआयसीसीमध्ये सचिव म्हणून देखील कार्यरत आहेत. या दोघींच्या सोबत कॉंग्रेसने गुजरात व पंजाबसाठी देखील प्रभारीपदाच्या नियुक्त्या केल्या आहेत.