‘ पाकमधून पंजाबमध्ये 50 बॉम्ब आलेत’, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्र्यांनी केली सोर्स सांगण्याची मागणी; अन्यथा…

Punjab grenade attack | पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री मनोरंजन कालिया यांच्या घरावर ग्रॅनेड हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. यातच आता पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांच्या एका वक्तव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एका खासगी मीडिया वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना बाजवा यांनी पंजाबमध्ये 50 बॉम्ब आले असून, त्यापैकी 15 बॉम्ब फुटले आहेत. तर उर्वरित 32 बॉम्ब अजूनही बाकी असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आहेत.
ही माहिती समोर येताच काउंटर इंटेलिजन्सचे आणि पंजाब पोलिसांचे पथक थेट प्रतापसिंग बाजवा यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बाजवा यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे.
बाजवा यांच्या वक्तव्यावर बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “जर विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांना पंजाबमध्ये बॉम्ब आल्याची माहिती होती, तर पाकिस्तानशी त्यांचा काही संबंध आहे का? दहशतवादी त्यांना थेट माहिती देतात का?
ही माहिती ना गुप्तचर विभागाकडे आहे, ना केंद्र सरकारकडून आली आहे. जर एवढ्या मोठ्या नेत्याला ही माहिती मिळते, तर त्यांनी तत्काळ पोलिसांना याची कल्पना द्यायला हवी होती. बॉम्ब फुटून लोक मरण्याची वाट पाहत होते का, जेणेकरून त्यांना राजकीय फायदा मिळेल? आणि जर हे विधान खोटं असेल, तर ते पंजाबमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा शब्दात मान यांनी बाजवा यांच्यावर निशाणा साधला.
प्रतापसिंग बाजवा यांनी मात्र त्यांच्या विधानाचे समर्थन करत सांगितले, “मला ही माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाली आहे. मी हे केवळ जनतेच्या सुरक्षेसाठी बोललो. मी काउंटर इंटेलिजन्सला सहकार्य करतो आहे, पण मी माझ्या सूत्रांचा खुलासा करणार नाही. मी जे काही सांगू शकतो, ते मी एआयजींना सांगितले आहे. पण या प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
काउंटर इंटेलिजन्सचे एआयजी रवजोत ग्रेवाल यांनी देखील याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “बाजवा यांनी अत्यंत संवेदनशील माहिती दिली आहे. त्यांनी 50 हँड ग्रेनेड्सच्या आल्याचा दावा केला आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित बाब आहे. आम्ही त्यांच्याकडून माहितीच्या स्रोताची चौकशी केली, पण त्यांनी सहकार्य केले नाही.





