भिगवण -करोना संकटाचा सामना करण्यात आघाडीवर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेत पोलीस पाटील हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. राज्य शासनाने पोलीस पाटील यांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे बारामती लोकसभा अध्यक्ष तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस पाटील सध्या गावातील कायदा, सुव्यवस्था, निर्जंतुकीकरण आणि सामाजिक अंतराच्या बाबींसाठी कार्य करीत आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्या नागरिकांना सामाजिक अंतराने ठेवणे, अन्न व सुरक्षा पुरविण्याचे कामही त्यांनाच करावे लागत आहे.
त्यामुळे ही मागणी करीत असल्याचे देवकाते यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रति विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही देण्यात आले आहे.