जयपूर: राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत माध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मुलांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता. मात्र तो खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना दूषित कढी भात दिला गेला असा आरोप करण्यात आल्याची माहिती करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.