कालवा ते काळेवाडी रस्त्यावरील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण
देऊळगाव राजे -दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बोरिबेल येथील कालवा ते काळेवाडी रस्त्यावर कोंबड्यांचे राहिलेले अवशेष, त्यांची पिसे, मृत कोंबड्या आणि औद्योगिक क्षेत्रातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.
काळेवाडी आणि बेरिबेल (ता. दौंड) येथील परिसरात काही पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही जण चिकन-मटण विक्रीची व्यवसायही करीत आहेत. या परिसरातील या व्यवसायातील काही नागरिक मृत कोंबड्यांचे अवशेष- जसे की पिसे आणि इतर गोष्टी रात्रीच्या सुमारास वाहनांमधून आणून या रस्त्यावर टाकत आहेत. वाऱ्यामुळे ही पिसे पसरली जात आहेत, त्याचबरोबर इतर अवशेष कुजल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत आहे. या सगळ्या गोष्टींचा त्रास येथील रहिवाशांसह प्रवाशांना देखील सहन करावा लागत आहे.
या अवशेषांच्या कचऱ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. वाऱ्यामुळे उडणाऱ्या पिसांमुळे आणि त्यांच्या कणांमुळे दम्यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील औद्योगिक वसाहतींमुळे आधीच येथील प्रदूषण वाढलेले आहे, त्यात आता या कचऱ्यामुळे प्रदूषणात अधिकच भर पडत आहे, त्यामुळे असा जैवकचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला
बोरिबेल कालवा ते काळेवाडी परिसरात टाकण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या पिसांमुळे आणि इतर जैव अवशेषांमुळे या भागात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. या रस्त्याने पहाटे फिरायला जाणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर दुचाकी, चारचाकी गाड्यांमागे टोळक्यांनी येथील कुत्री पळत जात असल्याने या गाडीचालकांचा गाड्यांवरील ताबा सुटून अपघातही वाढू लागले आहे. हा कचरा या परिसरात टाकला गेला नाही, तर पर्यायाने या भटक्या कुत्र्यांचा या परिसरातील वावरही कमी होईल, असे येथील नागरिक सांगत आहेत.