पिंपरी : हिंजवडी, माण, म्हळुंगे आणि मारुंजी परिसरात भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी आकुर्डी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत, एमआयडीसीला भूसंपादनासंबंधीचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे स्पष्ट आदेश दिले. माण रोड आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन रखडल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे किती शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागतील, याचा तातडीने अहवाल तयार करून SLR यांच्याकडून मोजणी करण्याचे निर्देश देखील डॉ. म्हसे यांनी दिले. दरम्यान, पीएमआरडीएमार्फत पर्यायी आणि अंतर्गत नवीन रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असून, वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीत शेतकऱ्यांच्या शंका-समस्याही ऐकून घेण्यात आल्या. नियमानुसार त्यांना टीडीआर किंवा मोबदला दिला जाणार आहे. गाव परिसरातील रस्त्यांची रुंदी ४५ मीटर ऐवजी २४ मीटर करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. या बैठकीस आमदार शंकर मांडेकर, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जमीन व मालमत्ता विभागाचे हिम्मत खराडे यांच्यासह एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेतकरी हिताला प्राधान्य हिंजवडी-माण रस्त्याच्या रुंदीकरण व भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचे हक्क व कल्याण सुरक्षित राहावे, यासाठी प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही होणार असल्याचे डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले. योग्य मूल्यांकन, नुकसानभरपाई आणि टीडीआर प्रक्रियेसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करून कोणत्याही शेतकऱ्याचे सामाजिक वा आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.