प्रभात वृत्तसेवा पुणे – दिवसभराच्या बऱ्याच घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांच्याशी फारकत झाल्याचे जाहीर केले. याला जेमतेम दीड दिवसही उलटला नसताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. मविआच्या रविवारी आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर त्यांना बैठकीसाठी संपर्क केला असता, काही पदाधिकाऱ्यांनी काॅल उचलले नाहीत. काहींचे मोबाइल ‘नाॅट रिचेबल’ लागले.शुक्रवारी अजित पवार यांच्यासोबत बैठक फिस्कटल्यानंतर गेल्या दोन दिवसांत शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, कालपासून चोवीस तासही उलटू न देता अचानकपणे शनिवारी शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बैठकीकडे पाठ फिरवली. आता बास झाले, यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने घेतली. त्यामुळे आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी झाली आहे. यामुळे पवार यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवावा की नाही, अशी स्थिती मविआतील अन्य पक्षांची झाली आहे.शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील पदाधिकारी अजित पवार यांना बारामती हाॅस्टेल येथे भेटायला गेले. मात्र, घड्याळाच्या चिन्हावर लढायचे, ही आणि अन्य काही पवार यांनी घातलेल्या अटी पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची आशा मावळली. त्यानंतर एका हाॅटेलमध्ये मविआची बैठक झाली. त्यात जागा वाटपाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे पदाधिकारी जाऊन बसले. ही बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत चालली. शनिवारी पुन्हा एकदा आघाडीची बैठक बोलावली; परंतु त्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे पदाधिकारी उपस्थितच राहिले नाहीत. रविवारीही तेच झाले. त्यामुळे आता त्यांना बरोबर घ्यायचे नाही, अशी भूमिका आघाडीतील अन्य पक्षांनी घेतली. “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, ते दिवसभर ‘नाॅट रिचेबल’ होते. त्यांना अजित पवारांबरोबरच जायचे होते, तर त्यांनी ते स्पष्ट सांगायला हवे होते. आमचे दोन दिवस उगाच वाया गेले. स्पष्टपणे निरोप देणे आवश्यक होते. मोबाइल बंद करून ठेवणे हे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे.” – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस “महाविकास आघाडीच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचे मोबाइल नाॅट रिचेबल आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसबरोबर जागा वाटपाची बोलणी करणार आहे. त्यामध्ये बहुतांश जागांवर चर्चा झाली असून, काही राहिलेल्या जागा अंतिम होतील.” – संजय मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष