मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत, असे मत व्यक्त केले. तसेच शरद पवारांना मी पंतप्रधानपदाच्या लायक मानत नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.
यंदाच्या निकालात भाजपला 148 ते 200 जागा तर काँग्रेसला 100पर्यंत जागा मिळतील, असे भाकीतही आंबेडकरांनी केले.
महाराष्ट्रातील लोकसभेसाठीचे संपूर्ण मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पंप्रधान कोण होणार ? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असल्याचे एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केले आहे.