PM Modi : 10 जूनला पीएम मोदी रचणार इतिहास, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना टाकणार मागे
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जून रोजी भारतीय राजकारणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा गाठणार असून, निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जून रोजी भारतीय राजकारणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा गाठणार असून, निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. या बाबतीत ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकतील.
26 मे 2014 रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नरेंद्र मोदी यांनी 10 जून 2026 पर्यंत सलग 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असेल. तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 13 मे 1952 पासून ते 27 मे 1964 रोजी निधन होईपर्यंत पंडित नेहरू यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून 4,398 दिवस देशाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे मोदी हे हा विक्रम मोडणारे पहिले नेते ठरणार आहेत.
इंदिरा गांधी तिसऱ्या क्रमांकावर –
या यादीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सलग 4,077 दिवसांचा कार्यकाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 1966 ते 1977 या कालावधीत देशाचे नेतृत्व केले होते.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राजकारणात गेल्या दशकभरात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय, मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी तिहेरी तलाक प्रथेवर घालण्यात आलेली बंदी तसेच अयोध्येतील राम मंदिर उभारणी यांसारखे निर्णय त्यांच्या कार्यकाळात साकार झाले.
मुख्यमंत्री म्हणून सलग तीन कार्यकाळ –
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग तीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केलेल्या मोदी यांनी 2014, 2019 आणि 2024 या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणारे ते स्वातंत्र्योत्तर काळातील मोजक्या पंतप्रधानांपैकी एक आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाची नोंद ठरणार आहे. मोदी आणि नेहरू या दोन्ही नेत्यांनी आपल्या-आपल्या काळात देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीवर दीर्घकालीन प्रभाव टाकला आहे.





