Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 84 वा वाढदिवस. यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शरद पवारांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. मात्र सोशल मिडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) यांनी देखील ट्वीटद्वारे (एक्स) शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“शरद पवार यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी माझी प्रार्थना, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…” असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोदींनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनाही वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेतून ते केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी ट्वीट –
My best wishes to Shri Sharad Pawar Ji on his birthday. May he be blessed with a long and healthy life. @PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एक गट भाजपसोबत गेला आहे. तर, दुसरा गट शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीकडून सातत्याने मोदी सरकावर टीका केली जाते. दरम्यान, काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेळी चांदवडच्या दिशेने येत असताना जागोजागी शेतकऱ्यांनी शरद पवार यांना भेटून निवेदन दिले. तसेच शरद पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यायला लावावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
त्यावेळी शरद पवार म्हणाले, “कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे आपणास रस्त्यावर उतरावे लागले. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडाली असेल. परंतु रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे.”