PM Modi-Trump Call: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकतीच फोनवरून चर्चा झाली. त्या संवादात जगातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये समावेश होणाऱ्या इलॉन मस्क यांनीही सहभाग नोंदवला, असा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, भारताने ते वृत्त स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ मोदी आणि ट्रम्प यांच्यातच चर्चा झाल्याची स्पष्टोक्ती भारताने केली. नेमकं काय घडलं? पश्चिम आशियातील युद्धाची धग जगभरात जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर, पश्चिम आशियातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यासाठी ट्रम्प यांनी २४ मार्चला मोदींना फोन कॉल केला. त्या चर्चेविषयी अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्राने सनसनाटी दावा केला. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवादात मस्क सहभागी झाले, असे वृत्त कथित अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने त्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. दोन देशांच्या प्रमुखांमधील दूरध्वनी संवादात एखाद्या नागरिकाचा सहभाग असाधारण स्वरूपाचा आहे. मस्क दूरध्वनी संवादात का सहभागी झाले आणि ते स्वत: बोलले का ते स्पष्ट होऊ शकले नाही, असे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले. याआधी ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे मानले जात होते. मात्र, ताज्या घडामोडीमुळे त्यांच्यात समेट घडल्याचे संकेत मिळतात, असे निरीक्षणही त्या वृत्तातून नोंदवण्यात आले. भारत सरकारचे म्हणणे काय? मात्र, ते वृत्त भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी फेटाळले. आम्ही संबंधित वृत्त वाचले. पण, केवळ मोदी आणि ट्रम्प या दोन नेत्यांमध्येच चर्चा झाली. त्यामुळे पश्चिम आशियातील स्थितीवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी म्हटले. मोदी यांनी केवळ ट्रम्प यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी इतर कुणी मोदींशी बोलले नाही, असे त्या घडामोडीची माहिती असणाऱ्या इतर सुत्रांनीही नमूद केले. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवादावेळी इतर कुणी उपस्थित होते का? इतर कुणी तो संवाद ऐकत होते का याविषयी अमेरिकेनेच काय ते स्पष्ट करायला हवे, असेही त्या सुत्रांनी सूचित केले. पश्चिम आशियातील युद्धाला २८ फेब्रुवारी यादिवशी तोंड फुटले. त्यानंतर प्रथमच मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. त्यांच्यातील चर्चेचा फोकस प्रामुख्याने होर्मूझची सामुद्रधुनी जागतिक जहाज वाहतुकीसाठी खुली ठेवण्याच्या गरजेवर होता. युद्धानंतर इराणने ती सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे गॅस, तेल वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे चित्र आहे.