नवी दिल्ली – अमेरिकेबरोबरच विविध देशांनी आयात मर्यादित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले असून जागतिक व्यापारात भारत अग्रेसर कसा राहील या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्यातदाराबरोबर चर्चा करणार आहेत. ज्या उद्योगांमध्ये मनुष्यबळाचा जास्त वापर होतो, अशा उद्योगांची निर्यात थांबल्यानंतर या मनुष्यबळासमोर बेकारीचा प्रसंग उद्भवतो. त्यासाठी अशा उद्योगाच्या वस्तूची निर्यात जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करीत असून या क्षेत्रातील उद्योजकांना आणि निर्यातदारांना पंतप्रधानांनी चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली. तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, दागिने, हस्तकला, इंजीनियरिंग आणि समुद्री खाद्य क्षेत्रातील उद्योजक या बैठकीत सहभागी होणार आहेत. निर्यात प्रोत्साहन परिषदाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होणार आहेत. अशा प्रकारच्या बैठका वाणिज्य मंत्रालयाने अगोदरच घेतल्या आहेत. आता स्वतः पंतप्रधान या बैठका घेणार आहेत. यावरून या विषयाला सरकार किती महत्त्व देते याची प्रचिती येते. जागतिक व्यापारात भारताचा वाटा फक्त दोन टक्के आहे. त्यामध्ये वस्तूंच्या बाजारात भारताचा वाटा 1.6% तर सेवाच्या बाजारात 3.3 टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात भारताची निर्यात आयातीपेक्षा कमी झाली आहे. अशा परिस्थितीत भारताची व्यापारातील तूट वाढून 31.15 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अरिकेच्या निर्णयाचा परिणाम – काही क्षेत्र वगळता भारतीय वस्तूवर अमेरिकेने 50% इतके आयात शुल्क लावल्यामुळे गेल्या तिमाहीत भारताच्या निर्यातीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. विशेषत: जास्त मनुष्यबळ लागणार्या उद्योगांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यासाठी चर्चा चालू असतानाच सरकार इतर देशांना निर्यात कशी वाढेल या संदर्भात प्रयत्न करीत असल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले.