हैदराबाद :- आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनला आहे, त्यात तेलंगणातील लोकांचा मोठा वाटा आहे. ते म्हणाले, “आज जेव्हा संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी येत आहे, विकसित भारताबाबत एवढा उत्साह आहे, तेव्हा तेलंगणापुढे संधी आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी शनिवारी तेलंगणातील वारंगल भेटीवर आले होते. वारंगल येथे पोहोचल्यानंतर त्यांनी भद्रकाली मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी राज्यासाठी सुमारे 6,100 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यानंतर पंतप्रधानांनी सभेत उपस्थित जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले की, आज प्रत्येक प्रकारे मूलभूत पायाभूत सुविधांसाठी अनेक पटींनी वेगाने काम केले जात आहे आणि महामार्गांसोबतच देशभरात आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉरचे जाळे तयार केले जात आहे. आजचा नवा भारत तरुण भारत आहे आणि तो उर्जेने परिपूर्ण आहे. 21 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात आपल्यासाठी सुवर्णकाळ आला आहे. या वेळेतील प्रत्येक सेकंदाचा आपल्याला पुरेपूर वापर करावा लागेल. वेगवान विकासाच्या कोणत्याही शक्यतेपासून देशाचा कोणताही कोपरा मागे राहू नये.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोदींनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प एकतर पूर्ण झाले आहेत किंवा ते निर्माणाधीन आहेत किंवा तेलंगणात सुरू झाले आहेत. वर्ष 2024 च्या अखेरीस तेलंगणामध्ये 2 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प होतील.
“घराणेशाही असलेल्या कॉंग्रेसचा भ्रष्टाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. संपूर्ण तेलंगणा घराणेशाही असलेल्या बीआरएसचा भ्रष्टाचार पाहत आहे. कॉंग्रेस किंवा बीआरएस, दोन्ही तेलंगणातील जनतेसाठी घातक आहेत. तेलंगणातील जनतेला या दोन्हीपासून दूर राहावे लागेल. तेलंगणात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या उघड खेळाचा सर्वात मोठा फटका येथील तरुणांना सहन करावा लागत आहे. तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या घोटाळ्याची माहिती कोणाला नाही? येथील सरकारने आपल्या नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी सरकारी नोकऱ्या हे माध्यम बनवले आहे. बीआरएस आणि कॉंग्रेस हे दोन्ही तेलंगणासाठी घातक आहेत.”
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधानांनी ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली त्यामध्ये सुमारे 5,550 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे 176 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या मंचेरियल-वारंगल विभागाचा समावेश आहे. हा विभाग मंचेरियल आणि वारंगलमधील अंतर सुमारे 34 किमी कमी करेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 आणि 65 वरील वाहतूक सुधारेल. पंतप्रधानांनी तेलंगणामध्ये 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काझीपेट या रेल्वे वॅगन उत्पादन युनिटची पायाभरणी केली.