PM Modi Speech: विरोधकांवर निशाणा, बांगलादेश हिंसाचारावर चिंता; पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मोठ्या गोष्टी

PM Modi Speech – आज 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 11व्यांदा तिरंगा ध्वज फडकवला. यासह पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विक्रमही मोडला. (pm modi independence day speech 2024)
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी अनेक खास गोष्टी सांगितल्या. बांगलादेशातील सध्याच्या राजकीय संकटासह अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
चला, जाणून घेऊया पंतप्रधानांच्या भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी…
1) लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे सर्वात मोठे स्वातंत्र्यदिनाचे भाषण होते, जे 98 मिनिटांचे होते. भारताच्या इतिहासातील इतर कोणत्याही पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा हे मोठे भाषण होते.
2) यापूर्वी, त्यांचे सर्वात मोठे स्वातंत्र्यदिनाचे भाषण 2016 मध्ये 96 मिनिटांचे होते, तर त्यांचे सर्वात छोटे भाषण 2017 मध्ये होते, जेव्हा ते सुमारे 56 मिनिटे बोलले होते.
3) बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आणि तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली. बांगलादेशच्या विकास आणि प्रगतीला भारत नेहमीच पाठिंबा देईल, असे मोदी म्हणाले.
4) आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी देशात समान नागरी संहितेबाबत सांगितले की, देशाला सांप्रदायिक नव्हे तर धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची आवश्यकता आहे.
5) महिलांवरील अत्याचारासाठी देण्यात येणाऱ्या शिक्षेला व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज आहे, जेणेकरुन अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहील, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या सरकारने “महिला-नेतृत्व विकास मॉडेल” वर काम केले आहे, परंतु तरीही त्यांना बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता आहे.
6) 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाच्या निमित्ताने मोदींनी कृषी क्षेत्रातील मोठ्या सुधारणा आणि देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरही भर दिला. सेंद्रिय शेती निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.
7) देशातील विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी इतर देशांमध्ये जातात, हे योग्य नाही, असे मोदी म्हणाले. त्यामुळे पुढील पाच वर्षांत मेडिकलच्या आणखी 75 हजार जागा वाढणार आहेत.
8) पंतप्रधान म्हणाले की, आम्ही फक्त एकच संकल्प घेऊन पुढे जात आहोत आणि तो म्हणजे विकास, पण असे काही लोक आहेत जे प्रगती सहन करू शकत नाहीत किंवा त्यांचा फायदा झाल्याशिवाय भारताच्या प्रगतीचा विचार करू शकत नाहीत. त्यांना अराजकता हवी आहे. या मूठभर निराशावादी लोकांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे.
9) मोदींनी भ्रष्टाचार आणि त्याचा गौरव यावर चिंता व्यक्त करत हा समाजाचा मोठा प्रश्न असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “मला माहित आहे की मला या लढतीची किंमत मोजावी लागेल, माझी प्रतिष्ठा पणाला लागेल, पण वैयक्तिक प्रतिष्ठेपेक्षा देशाचे हित महत्त्वाचे आहे.
10) भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जागतिक कार्यक्रम आयोजित करण्याची क्षमता असल्याचे मोदी म्हणाले. ते म्हणाले की 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात देश कोणतीही कसर सोडणार नाही.

