PM Kisan scheme : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून ९.३२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण १८,६४० कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी गुहाटी येथून एका क्लिकवर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. २२ व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. काही शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांची रक्कम जमा झाली असली तरी काहींना अद्याप हप्ता मिळालेला नाही. तज्ञांच्या मते, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, शेतकरी ओळखपत्र तयार न करणे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे सादर न करणे किंवा बँक खाते आधारशी लिंक नसणे यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नसावा. तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, आसाम राज्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठा लाभ झाला असून तेथील सुमारे १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.