मुदत संपत आलेले सुगंधी दूध वाटणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी
मंचर (पुणे) -आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंर्तगत 23 आश्रमशाळेतील 5 हजार विद्यार्थ्यांना कालबाह्य आणि मुदत संपत आलेले सुगंधी दूध वाटणारे अधिकारी, शिक्षक व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच खातेनिहाय चौकशीची मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाने आदिवासी सेवक रविंद्र तळपे व विविध संघटनांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी भागातील आश्रमशाळांतील मुलांना पुरविण्यात येणारे सुगंधी दूध हे 10/3/2020 ते 9/9/2020 असे कालखंडात देणे आवश्यक होते; परंतु कालबाह्य होत आलेले सुगंधी दूध 2/3 दिवसच इतके बाकी असताना आदिवासी मुलांना देऊन त्यांच्या जीवाशी खेळण्याचे कूट कारस्थान प्रकल्प आधिकारी, शिक्षक व ठेकेदार हे कोविड-19 च्या महामारी काळात करीत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत 23 आश्रमशाळांतील सुमारे 5 हजार मुलांना मुदत संपत आलेले सुगंधी दूध वाटणाऱ्या प्रकल्प अधिकारी, शिक्षक व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याची खातेनिहाय चौकशीची मागणी आदिवासी सेवक रविंद्र तळपे व शिवभावे जीवसेवा आदिवासी विकास संघ, आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशन, कळमजाई उपसा सिंचन परियोजना आदी संस्थांनी केली आहे.
- लॉकडाऊनच्या काळात आश्रमशाळा बंद असल्यामुळे दूध वाटप करण्यात आले नव्हते. शासनाच्या आदेशानुसार आता दूधवाटप करण्यात आले आहे.
-एस. टी. पंडुरे, सहायक प्रकल्प अधिकारी