Platelets: प्लेटलेट्स कमी-जास्त होणे धोकादायक; डेंग्यू-हिवतापात घ्या योग्य काळजी
Platelets

Platelets: अलीकडच्या काळात डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते. प्लेटलेट्स म्हणजे रक्तातील एक महत्त्वाचा घटक. शरीरात कुठेही जखम झाली किंवा अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला तर तो थांबवण्याचे काम प्लेटलेट्स करतात. त्यामुळे त्यांची संख्या योग्य मर्यादेत असणे अत्यंत गरजेचे आहे.
प्लेटलेट्सची निर्मिती शरीरात ‘थ्रोम्बोपोइटिन’ या हार्मोनमुळे होते. या पेशी साधारण सात ते दहा दिवस जिवंत राहतात आणि त्यानंतर नष्ट होतात. शरीरात सतत त्यांची निर्मिती सुरू असते. निरोगी व्यक्तीच्या एका घनमिलीमीटर रक्तात सुमारे दीड लाख ते चार लाख प्लेटलेट्स असतात. त्यांची संख्या 30 हजारांपेक्षा कमी झाली तर अंतर्गत रक्तस्रावाचा धोका वाढतो. नाकातून, कानातून किंवा शौचावाटे रक्त येऊ शकते. स्थिती गंभीर झाल्यास मेंदू, हृदय किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो.
प्लेटलेट्स कमी होण्याला ‘थ्रोम्बोसायटोपेनिया’ असे म्हणतात. डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनिया यांसारख्या विषाणूजन्य आजारांमध्ये ही समस्या अधिक दिसते. काही वेळा विशिष्ट औषधे, केमोथेरपी, कर्करोग, अनुवंशिक आजार किंवा मद्याचे अतिसेवन यामुळेही प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्सची संख्या 10 हजारांपेक्षा खाली गेल्यास तातडीने उपचारांची गरज भासते.
दुसरीकडे, प्लेटलेट्सची संख्या गरजेपेक्षा जास्त वाढली तर ‘थ्रोम्बोसायटोसिस’ ही अवस्था निर्माण होते. अशा वेळी रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू किंवा मूत्रपिंडाचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. काही वेळा रक्ताल्पता, संसर्ग किंवा शरीरातील सूज यामुळेही प्लेटलेट्स वाढू शकतात.

blood platelets
अनेकांना वाटते की प्लेटलेट्स देणे म्हणजे धोकादायक प्रक्रिया आहे. मात्र आजकाल रुग्णालयांमध्ये ‘इम्युनोसेपरेशन’ यंत्राद्वारे प्लेटलेट्स वेगळ्या करण्याची प्रक्रिया सुरक्षितपणे केली जाते. तंदुरुस्त व्यक्तीच्या शरीरातून मशीनद्वारे रक्त घेतले जाते, त्यातून प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात आणि उर्वरित रक्त पुन्हा शरीरात परत दिले जाते. त्यामुळे दात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. तरीही माहितीअभावी अनेकजण प्लेटलेट्स दान करण्यास कचरतात.
डेंग्यू किंवा हिवताप झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे डॉक्टर अशा रुग्णांच्या प्लेटलेट्सच्या संख्येवर सतत लक्ष ठेवतात. त्यांना भरपूर द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात पाणी कमी झाल्यास प्लेटलेट्सची संख्या आणखी घसरू शकते. त्यामुळे नारळपाणी, लिंबूपाणी, सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
आहारात हिरव्या पालेभाज्या, आवळा, चिकू, काजू, ब्रोकोली, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ घेणे गरजेचे आहे. आयर्न आणि हिमोग्लोबिन कमी असल्यास प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संतुलित आहार अत्यावश्यक आहे.
आयुर्वेदातही काही घरगुती उपाय सांगितले जातात. गुळवेलीचे सत्त्व मधासोबत घेणे, गुळवेल पाण्यात भिजवून त्याचे पाणी पिणे, सुदर्शन चूर्ण घेणे यांचा उपयोग होऊ शकतो. पपईचा रस प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तसेच बकरीचे दूध पचायला हलके असून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
एकंदरीत, प्लेटलेट्सची संख्या कमी-जास्त होणे दोन्हीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ताप, अंगदुखी, रक्तस्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.





