Pimpari News : चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ- चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्तता मिळावी, यासाठी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. यापूर्वी मुंबई, आझाद मैदान येथे आणि पुण्यामध्ये आरटीओ कार्यालयावर वाहन चालकांनी आंदोलन केले आहे. तरी देखील या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, ‘इ-चलन’ कारवाई चुकीची आहे. शासनाने बस मालकांना या त्रासापासून मुक्त करावे, अन्यथा पुन्हा राज्यात बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलनाच्या भडका उडेल असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला. शुक्रवारी, (दि.२२ मे) पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपरी येथे झाली. यावेळी पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी वेस्ट झोनचे उपाध्यक्ष किरण देसाई, पुणे बस असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी चिंचवड बस असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, दशरथ पानमंद, भाऊसाहेब घोमल, स्वामी गुजर, राहुल मुळे, देवदत्त रावल सर्व सभासद, पदाधिकारी आणि राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. टाटा मोटर्स कंपनीने प्रायोजक तसेच अशोक लेलँड आणि व व्ही. ई. कमर्शियल व्हेईकल या कंपन्यांनी सह प्रायोजक म्हणून सहकार्य केले.समारोप सत्रात संगीत कार्यक्रम आणि लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. स्वागत दीपक कलापुरे, सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे आणि आभार बाळासाहेब बोराटे यांनी मानले. नव्या तंत्रज्ञानाने खर्चात वाढ राजन जुनवणे यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या युरो सिक्स वाहनांमुळे खर्चामध्ये खूप वाढ झाली आहे. परंतु त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही. या तंत्रज्ञानामुळे ब्रेक डाऊनचे प्रमाण देखील वाढले आहे हे त्रासदायक आहे. तसेच टायर आणि स्पेअर पार्ट चे वाढलेले भाव उत्पन्नावर विपरीत परिणाम करतात. याच्या किमती कमी करून सरकारने वाहतूकदार, बस चालकांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. त्या परिस्थितीसाठी संघटनेने तयार राहावे किरण देसाई यांनी या व्यवसायातील अडचणी वर मात करण्यासाठी संघटनेची गरज असल्याचे सांगितले. तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे लॉक डाऊन सारखी परिस्थिती होऊ शकते, यासाठी संघटनेने तयार राहायला हवे. येणाऱ्या संकटांना संघटना एकत्रितपणे सामोरे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकाश गवळी यांनी महाराष्ट्रातील संघटनेच्या कामाची माहिती दिली. नियम, कायद्याचे पालन करावे पवन नवादे यांनी सांगितले, आरटीओ या सभासदांसाठी अनेक माहितीपर उपक्रमांचे आयोजन करत असते. प्रत्येक बस मालकांनी नियम आणि कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले.