पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यालगत अनेक मोठे मॉल, चित्रपट गृहे, मोठी रुग्णालये आहेत. या आस्थापनांकडून अवास्तव पार्किंग शुल्क आकारले जाते. काही ठिकाणी हे शुल्क इतके अधिक आहे की, सर्वसामान्य नागरिक या आस्थापनांच्या बाहेर रस्त्यावर आपली वाहने पार्क करतात. याचा इतर वाहनचालकांना त्रास होत अशा काही ठराविक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: शनिवारी-रविवारी अशा परिसरांमध्ये येथील वाहतूक प्रचंड मंदावते.
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवडगाव, चिंचवडस्टेशन, आकुर्डी – खंडोबामाळ चौक, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, वाकड, रावेत परिसरात मोठे मॉल आहेत. या मॉलमध्ये जीवनावश्यक सर्वच वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात. तसेच अनेक ऑफर असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी असते. शनिवार, रविवार, गुरुवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शहरातील सर्वच मॉल खचाखच भरलेले सतात. एकच गर्दी उसळत असल्याने तसेच प्रत्येकजण आपले दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन येत असल्याने वाहनांचीही गर्दी होते. अनेकजण पैसे आणि वेळ वाचविण्यासाठी आपली वाहने मॉल बाहेरील रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे इतर वाहन चालकांना मात्र, नाहक त्याचा त्रास होतो.
चिंचवड लिंक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मॉलमध्ये येणारे अनेक ग्राहक आपली वाहने येथील रस्त्याच्या कडेलाच लावतात. येथे रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच सायकल ट्रॅक आहे. तसेच दुचाकी पार्किंगही रस्त्याच्या कडेला आखलेली आहे. त्यामुळे राहिलेल्या रस्त्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. त्यामुळे येथे नियमित वाहतूक कोंडी होते. येथे मॉलचे पार्किंग आहे. मॉल्सचे पार्किंग मर्यादित असल्याने आणि शुल्क अत्याधिक असल्याने अनेकजण बाहेर व आसपासच्या परिसरात वाहने पार्क करतात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि इतरांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिंचवड स्टेशन येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मॉल आहेत. येथे काहीजण रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करतात. आकुर्डी येथील मॉलमध्ये येणारे वाहनचालकही आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. या दोन्ही ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचीही संख्या जास्त आहे. त्याची कोंडीत भर पडते. तर, काळेवाडी येथे येणारे ग्राहकही आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात.
पिंपळे सौदागर, जगताप डेअरी येथील मॉलचे स्वतंत्र पार्किंग असले तरी रस्ताच्या कडेला वाहने उभी केली जातात. येथील पार्किंग पेड आहे. त्यामुळे पैसे देऊनही येथे कोंडीचा सामाना करावा लागतो. त्यामुळे वाहतूक विभागाने योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
मॉलबाहेर, पदपथांवर हातगाड्या
अनेक मॉलच्या बाहेरील पदपाथवर ठिकठिकाणी पाणीपुरी, सॅडविच, पावभाजी या सह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या विक्रेत्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अतिक्रमणही तेवढीच मोठी झाली आहेत.
रस्ते मोकळे करण्याची मागणी
शहरातील मॉल आणि परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनामुळे गर्दीत वाढ होत आहे. या वाहनांचा विचार करता महापालिकेने पदपधावरील अतिक्रमण आणि पोलिसानी अंतर्गत रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.