पिंपरी – चिखली परिसरातील मोरेवस्ती आणि म्हेत्रेवस्ती परिसरातील पाणीप्रश्न मागील काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. त्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु प्रशासनाला अजूनही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश येताना दिसून येत नाही. म्हेत्रेवस्ती, चिंचेचा मळा आणि मोरेवस्ती परिसरातील पाण्याच्या वेळेत बदल करण्यात आला होता. परंतु याला स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सध्या पूर्वी प्रमाणेच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठा विभागाने मोरेवस्तीमधील पाणीपुरवठा सुरळीत न होण्याचे कारण म्हणजे 50 मीटर पाइपलाइन अष्टविनायक चौक येथे जोडण्याची बाकी आहे असे कारण दिले होते. प्रभातच्या वृत्तानंतर पाणीपुरवठा विभागाचे रामनाथ टकले यांनी संबंधित ठेकेदाराला तेथील पाइपलाइन टाकण्यास सांगितले. पाइपलाइन जोडल्यानंतर देखील पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेशा दाबाने होत नसल्याने महापालिका प्रशासनाने म्हेत्रेवस्ती, चिंचेचा मळा आणि मोरेवस्ती परिसरातील पाण्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. 12) ट्रायल बेसवर दोन टप्प्यात पाणी सोडण्यात आले. परंतु नियोजन बिघडल्याने पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न हानून पडला. म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती भागात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पुन्हा पाणीपुरवठा विभागाने पूर्वी प्रमाणेच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी भाग वाढला आहे. लोकवस्ती वाढल्याने पाण्याची नियोजन करणे कठीण होत आहे. सध्या पाटीलनगर येथील पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्या भागाला चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीचा पाणीप्रश्न देखील सुटणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
– संजय साळी, पाणीपुरवठा विभाग.
नागरिकांचा प्रशासनाच्या निर्णयाला विरोध
मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, चिखली भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. बहुतांश कुटुंबातील पती-पत्नी कामावर जात आहेत. त्यातून मुलांचे शिक्षण व घर प्रपंचा चालत आहे. त्यात मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. त्यात महापालिका प्रशासन काही भागात सकाळी तर काही भागात दहानंतर पाणीपुरवठा करणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी कामधंदा सोडून घरी बसण्याची वेळ येणार होती. त्यामुळे स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे, पांडुरंग साने यांच्याकडे तक्रारी करून पूर्वीप्रमाणेच सकाळी लवकर आणि नियमित तसेच पुरेशा दाबाने पाणी देण्याची मागणी केली आहे.
पंधरा दिवसांचा प्रश्न
सध्या पाटीलनगर, चिखली गावठाण परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पंधरादिवसांत पूर्णत्वास जाईल. तेव्हा कृष्णानगर येथील पाण्याच्या टाक्यावरील क्षेत्र कमी झाल्याने मोरेवस्ती आणि म्हेत्रेवस्ती परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांसाठी कमीत कमी भागासाठी पाणीपुरवठा केला तर पुरेसा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.