पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलावरून चिंचवड लिंकरोड, भाटनगरकडे जाणारा रस्ता कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होत आहे. चिंचवडकडून येणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालून यावे लागत असून कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
हा उड्डाणपूल अतिशय जुना झाला असून मोडकळीस आला होता. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत जानेवारी 2020 मध्ये खर्चास मान्यता देण्यात आली. त्यानंतर पूल दुरुस्तीचे काम चार टप्प्यांत करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात गोकुळ चौकातून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या रॅम्पचे, दुसऱ्या टप्प्यात मोरवाडीकडे जाणाऱ्या मार्गाचे काम करण्यात आले. तर, तिसऱ्या टप्प्यात उड्डाणपुलाचे शगुन चौक रस्त्याचे काम झाले आहे. आता भाटनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घालून अथवा मुख्य बाजारपेठेतून यावे लागते. तेथे खरेदासाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडी होते. परिणामी नागरिकांना कोंडीत अडकून पडावे लागते. त्यात वेळ वाया जातो.
चिंचवडला जोडणारा पूल
हा उड्डाणपूल भाटनगरकडे उतरतो. तेथून चिंचवड लिंकरोडला तो जोडला जातो. काळेवाडी, तसेच चिंचवड लिंकरोड येथून येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. वळका घालून शगून चौकाकडून यायचे झाल्यास कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता काळेवाडी, चिंचवड, पिंपरीला जोडणारा असल्याने सर्वांना सोईचा आहे. मात्र, कामासाठी बंद केल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाकडून लिंकरोडने चिंचवडला जाण्यासाठी इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून लिंकरोडने जाता येते. मात्र, पुलाच्या मध्यावर आल्यावर पुढे रस्ता बंद असल्याचे दिसते. त्यामुळे वाहनचालकांना तेथून पुन्हा माघारी फिरावे लागते. अथवा मुख्य बाजारपेठेतून मोठा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे येथे काम सुरू असल्याचा फलक असल्यास चालक आधीच शगुनचौकमार्गे जातील.
चार टप्पे
पहिल्या टप्प्यात गोकुळ रॅम्प.
दुसऱ्या टप्प्यात मोरवाडी रॅम्प.
तिसऱ्या टप्प्यात शगुन चौकाकडे जाणारा रॅम्प
चौथ्या टप्प्यात भाटनगर रॅम्प.