Pimpri Chinchwad : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ च्या राज्यस्तरीय अंतिम निकालात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच भूमी विषयांतर्गत महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. अभियान कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे डेस्कटॉप मूल्यांकन व फिल्ड मूल्यांकन करण्यात आले. दोन्ही मूल्यांकनांमधील एकूण गुणांच्या आधारे राज्यातील १४ गटांतील विजेत्यांची निवड शासन मान्यतेनंतर जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरण संरक्षण, हरित उपक्रम, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि जनजागृती यामध्ये प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम, जलसंधारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, हरित शाळा उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प, तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विविध पर्यावरणपूरक मोहिमा राबवल्या आहेत. नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांच्या सहभागामुळे अभियानाला व्यापक यश मिळाले. या यशाबद्दल महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन केले. राज्यस्तरावर मिळालेल्या या मानांकनामुळे पिंपरी चिंचवड शहराची पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख अधिक बळकट झाली आहे. आगामी काळात ‘माझी वसुंधरा ६.० अभियान’ ही देखील अधिक व्यापक स्वरूपात राबवून हरित, स्वच्छ आणि शाश्वत शहर घडविण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. ‘माझी वसुंधरा ५.० अभियानात मिळालेले यश हे पिंपरी चिंचवड शहराचे असून, पर्यावरण संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड शहर कटिबद्ध असून भविष्यातही अधिक प्रभावी उपक्रम राबविण्यात येतील. आगामी काळात तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि नवकल्पना यांना अधिक चालना देण्यात येईल.’- श्रावण हर्डीकर , आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका