पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशा आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या दीड वर्षांत अग्निशामक दलाला आगीचे एक हजार 43 कॉल आले. पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार होत असताना टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतीमध्ये स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा असते. अनेकदा ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने अग्निशामक दलाला अशा आगी शमविताना जिवाचे रान करावे लागते. तसेच विकास करताना आपात्कालीन परिस्थितीचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे जवळच्या ठिकाणी जातानाही अग्निशामक दलाच्या बंबांना वळसा घालून जावे लागते. अशावेळी दुर्घटनेत जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते.
कासारवाडी येथील रेल्वेगेट परिसरात आग लागल्यास अग्निशामक दलाला घटनास्थळी दाखल होण्यासाठी दापोडी येथून वळसा मारून यावे लागते. कंपन्यांमधील आग शमविण्यासाठी एमआयडीसीकडे यंत्रणाच नाही. त्यामुळे एमआयडीसीने अग्निशामक केंद्राकरिता भूखंड दिला आहे. मात्र महापालिकेने त्यावर पत्राशेड उभारले आहे.
गेल्या काही वर्षांत मोशी, चिखली, थेरगाव, तळवडे आदी भागांमध्ये नव्याने अग्निशामक उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र दापोडी, चिंचवड, पुनावळे आदी भागांमध्ये अग्निशामक केंद्र उभारणे आवश्यक असूनही महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.