Pimpri Chinchwad – शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधांचा प्रश्न मात्र कायमच राहिल्याचे चित्र पुनावळ्यातील काटे वस्ती परिसरात दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, अपूर्ण कामामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. सध्या रस्त्याची एक लेन पूर्ण करण्यात आली असली, तरी दुसरी लेन खोदून ठेवण्यात आल्याने संपूर्ण मार्ग धुळीने माखला गेला आहे. परिणामी वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याने अवजड वाहनांची रहदारी रात्रंदिवस सुरू असते. सिमेंट मिक्सर, डंपर आणि ट्रक यांसारख्या वाहनांमुळे रस्त्यावर अधिक वर्दळ असते. परंतू अपूर्ण रस्ता आणि उडणारी धूळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की, वाहन चालवताना दृश्यमानता कमी होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. या धुळीमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ अशा समस्या वाढताना दिसत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे रस्त्यावर साचलेल्या धुळीचे थर पावसाच्या किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावर रस्ता अत्यंत निसरडा बनतो. त्यामुळे दुचाकी वाहनांचे घसरण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे काही ठिकाणी छोटे-मोठे अपघाताच्या घटनाही नेहमीच होत असतात. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता अनेक दिवस उलटूनही काम अर्धवटच आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.