पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली पदपथ प्रशस्त झाले. मात्र अतिक्रमणांमुळे ते “फक्त पादचाऱ्यांसाठी’ राहिलेले नाहीत. एवढेच नव्हे तर रस्ता ओलांडण्यासाठी असलेला पादचारी सिग्नल शहरातून गायब होत आहे. काही ठिकाणच्याच चौकातच झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आहेत. रस्ता ओलांडताना आत्तापर्यंत शेकडो पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला हे पिंपरी चिंचवडकरांसाठी नक्कीच भूषणावह नाही. सध्याच्या काळात रस्त्यावरील सर्वांत दुर्लक्षित घटक पादचारी झाला आहे. त्यामुळे शहरात फक्त पादचाऱ्यांसाठी आहे तरी काय, अशी विचारण्याची वेळ आली आहे.
पदपथ नेमके कोणासाठी?
रस्त्यावरील पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी पदपथांची निर्मिती केली जाते. दुर्दैवाने शहरात पदपथ हे चालणाऱ्यांसाठी कमी आणि विक्रेत्यांच्या सामानांनी अधिक व्यापलेले आहेत. काही ठिकाणी दुकानदारांनी पदपथांवरील जागा अडवली आहे. परिणामी पादचाऱ्यांना पदपथांऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. अशात रस्त्याने जाताना एखाद्या वाहनाचा धक्का जरी लागला तरी अपघात ठरलेला आणि पुढे काय होईल हे देवाच्या भरवशावर!
कार्यकर्त्यांचे पुनर्वसन की हप्तेखोरी?
शहराच्या सर्वच भागांत ही अतिक्रमणे होत असल्याने नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे. अतिक्रमणांबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करतात. मात्र फेरीवाल्यांमध्ये बहूतांशजण हे नगरसेवकांचे कार्यकर्तेच असतात. मोक्याच्या ठिकाणी पदपथांवरील विक्रेते पोलीस, अतिक्रमण विभागाप्रमाणेच नगरसेवकांशीही “हप्ता’ बांधून घेतात. त्यामुळे नगरसेवक नागरिकांचीच समजूत काढतात. गेल्यावर्षी 13 मार्च 2022 पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला अडविणारे कोणी नाही. तरीदेखील महापालिकेने गेल्या वर्षभरात पादचाऱ्यांच्या वाटेत येणाऱ्या किती फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई केली हा प्रश्न उरतोच.
कुठे अतिक्रमण नाही ते सांगा
पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी मार्केट, भोसरी येथील पदपथांची काय अवस्था आहे, याबद्दल तर काही न बोललेले योग्य. ठरावीक भागांपुरते मर्यादित असलेले हे लोण आता सर्वच भागांत पसरत आहे. सांगवीपासून किवळेपर्यंत आणि दापोडी पासून ते निगडी-मोशी पर्यंत शहराचा एकही भाग, एकही पदपथ असा नाही, की तो 100 टक्के अतिक्रमणमुक्त आहे.
पदपथाची नियमित खोदाई ठरलेली
अतिक्रमण नसेल, अशा ठिकाणी महापालिकाच दर काही महिन्यांनी पदपथांची दुरुस्ती किंवा नव्याने काही सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पदपथ खोदते. त्यामुळे अशा अर्धवट उखडलेल्या किंवा कामे चाललेल्या पदपथांवरून चालायचे कसे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होतो.
झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नलही गायब
शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे वाहनांचा वेगही जास्त् असतो. अशा महामार्गावर व्यवस्थित रस्ता ओलांडता यावा, यासाठी पूर्वी काही सेकंदाचे “पादचारी सिग्नल’ होते. तसेच चौकात झेब्रा क्रॉसिंगही होते. यामुळे वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना रस्ता ओलांडणे सुरक्षित होते. मात्र स्मार्ट सिटीत हे झेब्रा क्रॉसिंग आणि पादचारी सिग्नही चौकांमधून गायब झाले आहेत.