पिंपरी – पावसाच्या संततधारेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते निसरडे झाल्यामुळे गुरुवारी (दि. 17) किरकोळ अपघाताची घटना घडली. वल्लभनगर येथील ग्रेसरेपटरेटरमध्ये निगडीकडे जाणाऱ्या दिशेला दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहन घसरल्याने एका वेळी तीन दुचाकीस्वारांचा अपघात झाला. यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना पाहता पावसाळ्यात वाहने सावकाश चालवा, असे वाहनधारकांना म्हणण्याची वेळ आली आहे.
पावसामुळे शहरातील रस्ते निसरडे झाल्यानंतरही वाहनचालक काळजी घेताना दिसत नाहीत. वाहने सुसाट वेगाने चालविण्यावर ते भर देताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्यासह इतरांचा जीवही धोक्यात घालण्याची वेळ येत आहे. शहरात गुरुवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. अचानक पाऊस आल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकजण वाहने वेगात पुढे घेऊन जात होते. त्यामुळे अपघाताच्या किरकोळ घटनांना देखील सामोरे जावे लागले. पावसाळ्यात अपघाताच्या शक्यता अधिक असतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याची सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
खड्डे चुकविताना कसरत
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत आहे. त्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात वाहने आपटून नुकसान होत आहे. तर हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
निगडीला कामानिमित्त जात होतो. त्याच वेळी माझ्या समोरून जाणारे दुचाकीस्वार घसरून पडले. त्या पाठीमागून जाणारे दोन दुचाकीस्वार देखील पडले. मी वाहन सावकाश चालवित असल्याने लवकर सावरलो.
– राहुल थोरात, नागरिक.