वडगाव मावळ, दि. 24 (प्रतिनिधी)- महावितरणकडून वीजग्राहकांच्या मीटरची रीडिंग घेण्यासाठी व विज बिलांचे वाटप करण्यासाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीकडून त्यांचे काम नियमितपणे केले जात नसल्याने अनेक वीज ग्राहकांना वेळेवर विजबिले मिळत नाहीत. तर वर्षानुवर्षे मीटरची रीडिंग देखील घेतली जात नसल्याने वीजग्राहकांना आलेल्या अतिरिक्त रक्कमेच्या चुकीच्या बिलंची दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.
चुकीच्या बिलांमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड एजन्सीवर कारवाईची मागणी
नागरिकांनी लेखी तक्रार केल्यास, कामचुकारपणा करणाऱ्या व ग्राहकांना नियामित सेवा न देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल.
– भारत पवार, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे
महावितरणने मीटरची रीडिंग घेण्यासाठी व विजबिले वितरित करण्यासाठी एजन्सी नेमली आहे. या एजन्सी मनमानी करत असून, ग्राहकांच्या मीटरची वर्षानुवर्षे रीडिंग घेत नाहीत. तसेच वीजबिल देखील वेळेत वितरित करत नसल्याने नागरिकांना अतिरिक्त व चुकीची वीजबिले दिली जात आहेत. या चुकीच्या बिलांची दुरुस्तीसाठी नागरिकांना वडगाव येथील महावितरण कार्यालयात हेलपाटे मारवे लागत आहेत. याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून यामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे.
मावळात घरघुती व व्यावसायिक असे एकूण सुमारे 52 हजार वीज ग्राहक आहेत. यापैकी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून किमान 80 ते 82 टक्के मीटरची नियमितपणे रिडिंग घेतली. उर्वरित 18 ते 20 टक्के ग्राहकांना अंदाजे बिले आकारली जातात. म्हणजेच प्रत्येक महिन्याला साधारणत: सुमारे 9 हजार ते 10 हजार नागरिकांना आपल्या चुकीच्या बिलांची दुरुस्ती करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यामध्ये विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांचा समावेश असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिल दुरुस्तीसाठी वडगाव येथे यावे लागते यामध्ये त्यांचा पूर्ण दिवस वाया जातो. तसेच महावितरण कार्यालय वडगाव शहराच्या बाहेर वाहतुकीची सोय नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याने ते सापडत नाही यामुळे चुकीच्या वीज बिलचा ग्राहकांना मोठा त्रास सहन
करावा लागतो आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात पीआरआय इलक्ट्रिक्स इंटरप्राइजेस, जून महिन्यात काश आयटी सोल्यूशन्स व सध्या सिस्टम ईलक्ट्रिक्स ही एजन्सी मीटर रीडिंग व वीजबिले वितरणाचे काम करत आहेत. अंदाजे रीडिंग घेणाऱ्या व वेळेवर बिले न देणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या काही एजन्सींवर बडतर्फीची कारवाई केली आहे. मात्र आता मावळ तालुक्यात एजन्सीचा कामचुकारपणा सुरू असताना त्यांना कोणाचे अभय आहे? असा सवाल नागरिक करत आहेत.