पिंपरी चिंचवड : ओल्या कचऱ्यासाठी बायोगॅस प्रकल्प गरजेचा ! आयुक्तांची माहिती : सध्या होत आहे खतनिर्मिती

पिंपरी – शहरात सध्या कचरा आणि पाणी पुरवठा या दोन मोठ्या समस्या आहेत. कचऱ्यावर महापालिकेने बरेच काम करत वीज निर्मिती, खत निर्मिती असे प्रकल्प राबविले आहेत. तरीदेखील ओला कचरा उरत असल्याने आता बायोगॅस प्रकल्पाबाबत विचार केला जात आहे. तसेच पुनावळे येथे नवीन कचरा डेपो उभारण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जमीन खरेदी करुन वन विभागाला देण्यात येणार आहे, याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.
शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरणाचे प्रमाण वाढले आहे. सुुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जात आहे. सध्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. हे खत पालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये वापरले जाते, तसेच काही शेतकरीही घेऊन जात आहेत. सुक्या कचऱ्याचा प्रश्न मिटला असताना ओल्या कचऱ्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी आतापासून पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची गरज असल्याचे आयुक्त सिंह यांनी म्हटले आहे.
पुनावळेतील कचरा जागेच्या आरक्षणात बदल केला नाही. त्या जागेच्या बदल्यात वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा शेजारील 22 हेक्टर खासगी जमीन नऊ कोटी रुपयांत खरेदी करुन दिली जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर अखेर पुनावळेतील जागा ताब्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. पुनावळेत अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर उभे राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरात दररोज 1200 टन ओला आणि सुका कचरा जमा होतो. हा कचरा संकलित करुन मोशीतील 81 एकर परिसरातील कचरा डेपोत टाकला जातो. ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण केले जात असून सुका कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाते. मोशीतील डेपोत 1991 पासून कचरा टाकला जातो. तिथे कचऱ्याच्या ढिगाचे डोंगर झाले आहेत. या डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे पुनावळे येथे कचरा डेपो सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
2025 पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा
दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे उंचावरील भागाला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे तक्रारींच्या संख्येत घट झाली. जास्तीचे पाणी उपलब्ध झाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठीची कामे वेगात सुरू आहेत. 2025 पर्यंत वाढीव पाणी मिळेल. तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा राहण्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले. तसेच पवना धरणात 15 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के पाणीसाठा होता. मात्र, पुढील वर्षी अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये पाण्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.





