2021-22 मध्ये एक हजारपैकी केवळ 670 लाभार्थी पात्र, 339 अपात्र
2022 मध्ये विधानसभानिहाय आलेले अर्ज
चिंचवड विधानसभा 129
पिंपरी विधानसभा 143
भोसरी विधानसभा 86
पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – संजय गांधी निराधार योजनेतून महिन्याकाठी केवळ एक हजार रुपयांची तुटपुंजी रक्कम हातात पडत आहे. त्यासाठीही कागदपत्रांच्या पूर्तता करताना नाकी नऊ येत आहे. या किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे या योजनेकडे अर्ज करण्याला नागरिक पाठ फिरविताना दिसत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून 2021-22 या वर्षात केवळ 1 हजार 9 नागरिकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे. या पैकी 670 लाभार्थ्यांचेच अर्ज पात्र ठरले असून 339 अपात्र ठरले आहेत. 2022 मध्ये तर या योजनेसाठी केवळ 358 जणांनीच अर्ज केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिलांना आर्थिक सहाय्य्य केले जाते. जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही असा योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याकाठी अवघे एक हजार रुपये मिळत आहे. मिळणारी ही तुटपुंजी रक्कम आणि कागदपत्रांची पूर्तता पाहता ही योजनाच नको अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. 2021-22 या वर्षात केवळ 670 लाभार्थ्यांचेच अर्ज पात्र ठरले आहेत. तर कागदपत्रांची पूर्तता न करणे, अटी शर्तीत न बसणे आदीसह विविध कारणामुळे 339 नागरिकांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्यांना पुन्हा पूर्तता करायला सांगून लाभ देणार असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. आलेल्या अर्जाची संख्या आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाढती संख्या पाहता योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
योजनेची माहिती घेण्यासाठी आकुर्डीतील कार्यालयात आलो होतो. मात्र कागदपत्रांची भलीमोठी यादी समोर ठेवली. रोजगार बुडवून ही कागदपत्रे कधी जमा करायची असा प्रश्न पडतो.
– शीतल कुंभार
कागदपत्रांची मोठी यादी
योजनेचा लाभ घेण्यासाठी जमा कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेने नागरिक त्रस्त होत आहेत. यामध्ये मतदान कार्ड, आधार कार्ड आदीसारखा ओळख पुरावा, ग्रामसेवक, तलाठी यांनी दिलेला रहिवाशी दाखला, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, अपंगांचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचा दाखला, इतर कागदपत्र आदीसह अनेक किचकट कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांमध्येही अर्टी शर्ती घालून दिलेल्या आहेत. त्याची पूर्तता करताना नागरिकांची दमछाक होत आहे. परिणामी ते याकडे पाठ फिरवत आहेत.
ऑनलाइबाबत माहिती नाही
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना केली जाते. मात्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरायचा या बाबत नागरिकांना माहिती नाही. त्या बाबत कार्यालयाकडूनही प्रत्यक्ष वेगळे उपक्रम राबवून जनजागृती केली जात नाही. परिणामी अनेक जण याकडे दुर्लक्षच करत आहेत.