पिंपरी – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी व आकुर्डी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांचा प्रकल्प बांधला आहे. येथील 938 सदनिकांसाठी 8 हजार 383 अर्ज आले आहेत. अर्ज करण्यास अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांनी त्वरीत अर्ज करावेत, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात आहे. हे शहर उद्योगनगरी असल्याने कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश कामगार हे घरमालकासोबत भाडे करार करुन वर्षानुवर्षे राहत आले आहेत. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शहरात स्वतःचे घर खरेदी करणे सर्वसामान्य कामगाराला परवडणारे नाही.
अशा आर्थिक दुर्बल घटकातील कामगारांना सुध्दा हक्काचे घर घेता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरीतील प्रकल्पात 370 आणि आकुर्डीतील प्रकल्पात 568 सदनिका बांधल्या आहेत. या घरांचे वाटप करण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजेच 3 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी असणारे नागरिक अर्ज करु शकतात. आजअखेर पिंपरीतील 370 घरांसाठी 3 हजार 401 अर्ज आले. तर, आकुर्डीतील 568 घरांसाठी 4 हजार 982 अर्ज प्राप्त झाले आहेत.
आर्थिक दुर्बल घटकासाठी पिंपरी व आकुर्डी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधलेल्या गृह प्रकल्पात घर घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 ऑगस्ट पर्यंत आहे. मुदत संपायला अवघे दोनच दिवस उरले आहे. त्यामुळे नारिकांनी हक्काचे घर घेण्यासाठी त्वरीत अर्ज करावेत.
-अण्णा बोदडे, सहायक आयुक्त