पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने दहावी व बारावीतील 250 गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर चुकून दोनवळा बक्षिसाची रक्कम जमा केली. त्यापैकी 246 विद्यार्थ्यांनी ही रक्कम परत केली असून 4 विद्यार्थ्यांचे पैसे येण्याचे बाकी आहेत.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविली जाते. दहावी व बारावीमध्ये मध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजार तर, 80 ते 90 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जातात. यासाठी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांकडून गुणपत्रिका, आधारकार्ड, शहरात वास्तव्यास असल्याचा पुरावा, बॅंक खात्याची माहिती घेतली जाते.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी बॅंकेकडे दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. 250 विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये दोनदा पाठविण्यात आले. दोनदा पैसे गेल्यानंतर ही रक्कम परत मिळविण्यासाठी समाज विकास विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना मोबाइलवर संदेश पाठवत, फोन करत जास्तीची रक्कम परत पाठविण्याची विनंती केली. 250 पैकी 246 विद्यार्थ्यांनी दोनवेळा आलेले पैसे परत केले. पण, 4 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रतिसाद दिला नाही.
दोनवेळा बक्षीस मिळालेल्या 246 विद्यार्थ्यांकडून पैसे परत आलेले आहेत. फक्त चार विद्यार्थ्यांनी पैसे परत केले नाहीत. मागील शैक्षणिक वर्षातील दहावी, बारावीच्या 4 हजार 593 गुणवंत विद्यार्थ्यांना 10 कोटी 14 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. एकही विद्यार्थी बक्षीसापासून वंचित राहिलेला नाही.
अजय चारठणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग