प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पाण्याच्या टँकर चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे टँकर चालवून एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी महाळुंगे ते तळवडे रोडवर घडली.वासिम इक्बाल मिन्ने (४२, तळेगाव, मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अमीरइक्बाल मिन्ने (३६, छत्रपती संभाजी नगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राजु रामायण प्रजापती (४३, कोरवा, रुद्रपुर, देवरिया, उत्तरप्रदेश सध्या खालुंब्रे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू रामायण प्रजापती याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर (एमएच १४/केक्यु ९९९९) हा हयगयीने, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवला. त्याने तळवडे बाजूकडे जाणारे वासिम इक्बाल मिन्ने (४२, तळेगाव दाभाडे, मावळ) यांच्या मोटार सायकलला (एमएच १४/ एफपी १६१०) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात वासिम मिन्ने यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आणि टँकरचे क्लीनर बाजूचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर जखम होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.