प्रभात वृत्तसेवा शिरूर – पिंपरखेड, जांबूत परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत तीन जणांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर वनविभाग आणि रेस्क्यू टीमने रात्रीच्या कारवाईत एक बिबट्या ठार मारला; मात्र आता हा ठार केलेला बिबट्या खरोखरच नरभक्षक होता का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने मारलेल्या बिबट्यालाच नरभक्षक असल्याचे जाहीर करून कारवाई संपल्याचे घोषित केले असले, तरी स्थानिक नागरिकांचा दावा आहे की, तीनही हल्ले वेगवेगळ्या ठिकाणी झाले असून एकाच बिबट्याने हे सर्व हल्ले केले असल्याचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे वनविभागाने घाईघाईने कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतल्याचा आरोप नागरिक करत आहेत.दरम्यान, परिसरात अजूनही बिबटे फिरत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांच्यावर वारंवार हल्ले होत असून नुकताच पिंपरखेड येथे एका महिलेवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. म महिला थोडक्यात बचावली. त्यामुळे नागरिकांचा वनविभागावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकच बिबट्या मारला म्हणजे धोका संपला असं कसं म्हणता येईल? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला आहे. पिंजर्यांमध्ये अजून काही बिबटे अडकले असल्याची माहिती समोर येत असून, वनविभाग हे बिबटे पुन्हा जंगलात सोडणार का? यावरही जनतेत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. जोपर्यंत सर्व बिबटे पकडून सुरक्षित ठिकाणी हलवले जात नाहीत, तोपर्यंत आमच्या भागात खरी शांतता निर्माण होणार नाही. सध्या पिंपरखेड जांबुत व परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी संध्याकाळी शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. वनविभागाने पारदर्शक तपास अहवाल जाहीर करून खरा नरभक्षक कोण होता हे स्पष्ट करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. “बिबट्याचा मारल्यानंतर त्याचा अहवाल अजूनही आला नाही. तरीही वनविभागाने त्यालाच नरभक्षक ठरवून लोकांमध्ये शांतता निर्माण करण्याचा दिखावा केला आहे. ही अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी भूमिका आहे.” -नितीन पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते