अरुण गोखले
तीर्थ म्हणजे पवित्र पाणी. गंगा, यमुना सरस्वती यासारख्या पवित्र नद्यांच्या पाण्यास आपण तीर्थ असे म्हणतो. अशी तीर्थ जिथे असतात त्या जागा, ती स्थाने म्हणजेच तीर्थक्षेत्रं होत. आपल्या भारतात अशी अनेक तीर्थक्षेत्रं असून तेथील देवदेवतांच्या वास्तव्याने त्या तीर्थक्षेत्रांना आपल्या संस्कृतीत एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इतकेच नाहीतर अशा तीर्थक्षेत्रांना भेटी देणे अर्थात तीर्थयात्रा करणे हे एक पवित्र आणि पुण्य संचयी कर्म मानले गेले आहे.
पवित्र नद्यांच्या काठी वसलेली ही स्थाने तेथील देवदेवता, साधू, संत, सत्पुरुष ह्यांच्या निवासामुळे या क्षेत्रांना मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे उदा. काशी, अयोध्या, मथुरा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, नरसोबाची वाडी इ. या सारख्या पवित्र क्षेत्रांना भेटी देणे तेथील देवदेवतांची दर्शन घेणे, तिथे जाऊन काही दानधर्म, पुण्यकर्म करणे ह्यास विशेष प्राधान्य देले गेलेले आहे. आपल्या अनेक धार्मिक ग्रंथांतून ह्या आणि अशा प्रकारच्या तीर्थयात्रेचे महत्त्व सांगितलेले आहे. श्री गुरूचरित्र ह्या ग्रंथाच्या पंधराव्या अध्यायात श्री गुरूदेवांनी आपल्या शिष्यांना तीर्थमहात्म्य वर्णन करताना असे सांगितले आहे की, माणसांनी पुण्य पदरी जोडण्यासाठी तीर्थयात्रा अवश्य कराव्यात.
कारण तेथील भूमी पवित्र असते. तेथील वायू सुगंधित असतो. तिथल्या नद्यांच्या तीर्थात स्नान केले असता तनाची, मनाची शुद्धी होते. त्या स्थानी निवास केल्याने देवदेवतांचे दर्शन घडते. जसे की काशीत श्री काशी विश्वेश्वराचे, गयेत भगवान विष्णूंचे, अयोध्येत श्रीरामाचे, मथुरेत श्रीकृष्णाचे, चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलाचे, तर कृष्णातीरी नरसोबाची वाडीस श्री दत्तात्रयांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घडते, तर रामेश्वरी श्री आदिनाथांसह श्री रामरायाचीही भेट घडते.
अशा क्षेत्रात निवास केला, तिथे दानधर्म, पुण्यदायी कर्म केली असता पदरी पुण्य पडते. तिथे साधू-संतांच्या सत्पुरुषांच्या भेटी होतात. त्यांच्या दर्शनाने भवबंधनाच्या गाठी सुटतात. भक्तीची वाट सापडते. पुण्य भूमीच्या स्पर्शाने मनातील पापाचा नाश होतो. त्या भूमीत मुखी नकळतच ईश्वराचे नामस्मरण येते. त्या नामस्मरणाने जीवाचे कल्याण होते. अशा तीर्थयात्रा करून आल्यावर आपल्याकडे जे मावंदे घालण्याची प्रथा आहे त्यातसुद्धा आपली यात्रा सफल करवून घेणाऱ्या देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्याचे पूजन करण्याचा प्रघात आहे.