संगमनेर -शहरात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने काही भाग सील करण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याचे चित्र आहे. तसेच या कत्तलखानेचालकांकडून मांसाचे तुकडे निंबाळे शिवारातील प्रवरा नदीवरील पुलाजवळ आणून टाकण्यात येत आहेत. तसेच मांसाचे रक्त मिश्रित पाणी नदीत सोडण्यात येते आहे. हेच पाणी थेट पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींत झिरपत असल्याने संगमनेर शहराजवळील तीन गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संगमनेर शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील काही भाग सील करण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. असे असले तरी शहरातील कत्तलखाने मात्र चोरट्या मार्गाने सुरूच असल्याचे चित्र आहे. तसेच अत्यावश्यक सेवा असे वाहनावर स्टीकर चिकटवून सर्रास या मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघडही झाले आहे. सध्या या कत्तलखान्यांतून निंबाळे शिवारातील प्रवरा नदीवरील पुलाजवळ अज्ञात इसम मोठ्या प्रमाणावर मांसांचे तुकडे आणून टाकत आहेत. निंबाळे गावापासून रायते गावासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर आहे व त्याच विहिरीच्या पाण्याचा नागरिक पिण्यासाठी वापर करतात.
मांसामुळे विहिरीचे पाणी दुषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.त्याच प्रमाणे सदर मांसांचे तुकडे परिसरात टाकल्याने दुर्गंध पसरलेली आहे. सध्या करोना विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना काही समाजकंटक मांसाचे तुकडे पाणीपुरवठा विहिरीच्या परिसरात आणूनटाकत आहेत. त्यामुळे अशा समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
वाघापूर, रायते आणि निंबाळे या ग्रामस्थांनीही संगमनेर शहर पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, त्यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना याबाबत माहिती दिली. नगरपालिकेतर्फे त्या मांसची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ज्याने हे मांसाचे तुकडे पाणीपुरवठा विहिरीजवळ टाकले आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.