नवी दिल्ली : देशात विषारी कफ सिरपमुळे अलीकडेच मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू झाले. या प्रकारानंतर देशातील औषध उत्पादक कंपन्यांना जागतिक उत्पादन मानके पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यापुढे कंपन्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, असे भारताच्या औषध नियामकांनी स्पष्ट केले आहे. विषारी कफ सिरपमुळे सप्टेंबरमध्ये २४ बालके दगावली. यामुळे हादरून गेलेल्या यंत्रणांनी सर्व उत्पादक कंपन्यांची झाडाझडती घेतली. काही कंपन्यांच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली. औषध कंपन्यांनी जागतिक मानकांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना याआधीही सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मोठ्या औषध कंपन्यांनी जून २०२४ ची अंतिम मुदत पूर्ण केली, तर लहान उत्पादकांना डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत पूर्वीच्या मुदतवाढीचा भाग म्हणून देण्यात आली. या उद्योग गटांनी आणखी मुदतवाढ मागितली होती. दरम्यान, केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर आधी जागतिक निकष पूर्ण करून ते १ जानेवारीपासून लागू करण्याचे आदेश दिले. तपासणीदरम्यान कोणत्याही उत्पादक कंपनीने सुधारित शेड्यूलनुसार अंमलबजावणी केली नसल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई सुरू केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.