मंचर -निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत अवघ्या बारा सेकंदात किवळे येथील बाळासाहेब सीताराम शिवले यांचा बैलगाडा फळीफोड ठरला. बैलगाडा घाटाचे उद्घाटन शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 22) सकाळी करण्यात आले.
जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त निघोटवाडी येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत 575 बैलगाडे सहभागी झाले असून, ही यात्रा दोन दिवस सुरू राहणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी राजुशेठ पांडुरंग निघोट यांचा बैलगाडा “घाटाचा राजा’ या किताबाचा मानकरी ठरला आहे.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, दत्ता थोरात, सुहास बाणखेले, नीळकंठ काळे उपस्थित होते. द्वितीय क्रमांक 13 सेकंदात रावजी घमाजी पिंगळे – नारोडी यांचा बैलगाडा फळीफोड, तर तृतीय क्रमांक 14 सेकंदात निरगुडसर येथील नारायण देवराम गवारी यांचा बैलगाडा फळीफोड ठरला.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यात्रेस भेट देऊन बैलगाडा मालकांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे,उद्योजक बाबाजी टेमगिरे यांनी यात्रेला भेट दिली.
सरपंच नवनाथ निघोट, माजी उपसरपंच शिवाजी निघोट,संभाजी निघोट,सनद निघोट, दयानंद एरंडे, राजाराम निघोट, श्यामकांत निघोट व ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन केले.