कोरेगाव भीमा – ज्या पेशवाईचा पाढा म्हणून हा विजय रणस्तंभ उभारला गेला. त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक सध्या सरकारमध्ये आहेत. ते अभिवादन करायला येथे येतील का, ही अपेक्षाही आम्ही करीत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील 205 व्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भेट देऊन अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अंधारे म्हणाल्या की, करनी सेनेसारख्या चिल्लर लोकांवर मी काही बोलणार नाही. पण यांचे जे बोलविते धनी आहेत. त्या भाजपमधील कोणत्याही नेत्याने हे बोलून दाखवले की मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे, हे दाखवून देऊ, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
अंधारे म्हणाल्या की, विजय रणस्तंभ येथे अभिवादन करून नवीन वर्षाची सुरुवात ही एका ऊर्जादयी दिवसाने केली आहे. यावेळी सेवा सुविधांविषयी समाधान व्यक्त करीत बस थांबा दूर आहे. अनुयायांना दूरवरून पायी चालत यावे लागते. सुरक्षेच्या नावाखाली लोकांनीं गैरसोय होत आहे. शासनाचे इतर नियोजन सुंदर आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.