ग्रामीण कथाकार व कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. मात्र वाचनाच्या छंदामुळे त्यांचा वाङ्मयीन व्यासंग मोठा होता. आपल्या असामान्य प्रतिभेने त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली. त्यांनी इंग्रजी वाङ्मयाचेही विपूल वाचन केले. त्यांच्यावर काही पाश्चात्य लेखकांचा प्रभावही दिसून येतो. यात प्रामुख्याने जॉन स्टीनबेक, जॉर्ज ऑरवेल आणि लिमाय ओ’फ्लाहर्टी या लेखकांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
त्यांना चित्रकलेची आवड होती. ते चित्रकलेचे शिक्षणही घेत होते; पण त्यांच्या एका कथेला पुरस्कार मिळाला त्यामुळे त्यांनी आपले लक्ष लेखनावर केंद्रित केले. तसेच काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले. पटकथाकार म्हणूनही त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. पुढे त्यांनी ऑल इंडिया रेडिओतही काम केले.
त्यांनी आठ कादंबऱ्या, दोनशे कथा, चाळीस नाटकं आणि काही लोकनाट्येही लिहिली. गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. तू वेडा कुंभार, सती, पती गेले काठेवाडी ही त्यांची काही नाटकेही गाजली.
त्यांच्या “माणदेशी माणसं’ या व्यक्तीचित्रणात आलेल्या व्यक्तींचे अंतर्मन उलगडताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असलेली दरिद्रीपणाची, दुःखाची किनार नजरेसमोर येते. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यात “माणदेशी माणसं’चा समावेश होतो. या व्यक्तीचित्रांत जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच; पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे. अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही चित्रे अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात. हे दुःख पाहिलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात, असा उदार विचार मनात येतो.
जीवनातील हे कारुण्य माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे. त्यामुळे त्यांची ही “माणसं’ आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करून टाकतात. एकूण सोळा व्यक्तिचित्रणं यात साकारण्यात आली आहेत. यात विविध जातींची छटा आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवनही रेखाटलेले आहे.
तालेवार व्यक्तींपासून दरिद्री व्यक्तींचा यात वावर आढळतो. काही आप्तस्वकियांचा अनुभवही मनाला थिजवून टाकणारा आहे. खालच्या जातीतील व्यक्तींचे रेखाटलेले जीवन मात्र आपल्या डोळ्यांपुढून जात नाही. फक्त श्वास घेऊन जगणे हे त्यांच्या नशिबी. कारण एवढे एकच त्यांच्या हक्काचे आहे. यातील नायक आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा आहे. तो संघर्षाने पेटलेला नाही. त्याला दारिद्य्र फेकून द्यायचे नाही. समोर आहे त्या परिस्थितीला तोंड देणारी ही माणसं आहेत.
त्यांच्या कथा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने डॅनिश, जर्मन, जपानी, रशियन आणि इंग्रजी आदी भाषांचा उल्लेख करावा लागेल. माडगूळकरांच्या “सत्तांतर’ या कादंबरीस 1983 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1983 मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले. 28 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचे निधन झाले.
शर्मिला जगताप