Sharad Pawar | NCP MLA – पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण ते जयंतरावांना भेटतात, त्याची कल्पना मला दिली जाते, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. अजित पवार गटाकडून हा दावा खोडला जातो. परंतु आज खुद्द शरद पवार यांनी पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांबद्दलची माहितीच पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी राज्यसरकारच्या कामकाजावर देखील त्यांनी ताशेरे ओढले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केले. त्या योजनेचे स्वागतच आहे. राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण, इथं केवळ 8 दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. वाघनखांवरुन पवारस्टाईल टोला इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे, इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं योगदान आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र, यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन असलेल्या वादावरही शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत सरकारला टोला लगावला.