मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील उद्याच्या जाहीर सभेची जोरदार तयारी झाली असून ही रेकॉर्डब्रेक सभा होईल असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला. तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला.
राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ईडीच्या प्रकरणानंतर संजय राऊत काहीही बडबडायला लागले आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील जनता सगळे बघते आहे. जनतेला राज ठाकरे आणि मनसेचे हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे आणि लोकांना ते आवडतेय असे सरदेसाई म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दरम्यान, महाराष्ट्रात चुकीची भाषा चालू देणार नाही असा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला आहे. सभा घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, मात्र त्याने कायद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, वातावरण बिघडणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे, असा इशारा पवार यांनी दिला आहे. यावर अजित पवार यांनी सर्वात आधी त्यांच्या पक्षातील लोकांना चुकीची भाषा चालणार नाही हे सांगावे आणि मग दुसऱ्यांना उपदेश करावा, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
आधी हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक आज कसे उलट वागत आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जनता त्यांना योग्यवेळी धडा शिकवेल. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी आपण कुठे होतो याचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभा घ्यावी लागतेय याचाच अर्थ राज ठाकरे जे बोलत आहेत ते लोकांना आवडतेय. त्यामुळे त्या सर्वांनी याचा धसका घेतला आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना हातपाय हालवावे लागत आहेत, अशी टीप्पणी त्यांनी केली.