मुंबई – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकार कोसळणार की स्थिर राहणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सूचक विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. मात्र शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपच असल्याचा आरोप करण्यात येतोय. सध्याच्या घडामोडींचा उल्लेख न करता गडकरींनी महत्त्वपूर्ण मत मांडलं आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यात ‘शॉर्ट कट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोक नंतर अशांना दारात उभंही करीत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता गडकरींचं हे विधान महत्त्वपूर्ण मानल जात आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करणार नसल्याचं म्हटलं. मात्र भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर आपल्याला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.