मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणताही विलंब न करता उद्याच पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. व बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे भाजपासमोर उद्याच बहुमत सिद्ध करण्याच आव्हान असणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सत्याचा विजय होतो हे न्यालयायाने दाखवून दिल्याचे म्हंटले आहे.
एकनाथ शिंदेंनी म्हंटले कि, सत्याचा विजय होतो हे न्यायालयाने दाखवून दिल. आम्ही कालच १६२ आमदारांच पत्र राज्यपालांना दिल होतं. तसेच चोरी-छुपे स्थापन झालेल्या सरकारने राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे आमचा एकही आमदार कोणी फोडू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होतेय याचा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आनंद आहे, असेही शिंदेंनी सांगितले.