उंब्रज – जनतेची कामे न करणाऱ्या निष्क्रीय आमदारांना जनता वैतागून गेली आहे. त्यामुळे आता वैतागलेल्या जनतेचंही ठरलंय, ते म्हणजे कराड उत्तरमध्ये परिवर्तन हे करायचं, अशी टीका कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. उंब्रज येथील प्रचारानिमित्त आयोजित कोपरासभेत ते बोलत होते. मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ भुयाचीवाडी, शिरगाव, पेरले, मरळी, वडगाव, वराडे कोर्टी, भोसलेवाडी, पाली, हरपळवाडी, हिंगनोळे या गावात काढण्यात आलेल्या पदयात्रेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मनोज घोरपडे म्हणाले, उंब्रजसारख्या बाजारपेठेचे गाव नगरपंचायत होणे गरजेचे असताना जनतेने वारंवार निवेदन देऊनही आमदारांनी त्याला खो घातला तसेच जेव्हा उंब्रजमधील आतिक्रमण काढले तेव्हा येथील व्यापारी बंधुंनी या संदर्भात तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले. मात्र या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा आम्ही त्या व्यापाऱ्यांची बाजू वरिष्ठ नेत्यांपर्यंत मांडली. उंब्रज विभागातील 70 गावासाठी अप्पर तहसील कार्यालय व्हावे यासाठी प्रस्ताव दाखल केला असून त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल, असे सांगून मनोज घोरपडे म्हणाले, जो आमदार पाच वर्षांतून फक्त निवडणुकांपुरता दिसतो अशा प्रचंड व्याप असणाऱ्या लोकप्रतिनिधीला आता सर्वसामान्य जनता सक्तीची निवृत्त घ्यायला लावणार आहे.
आत्तापर्यत कराड उत्तरचे स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार हवेत होते पण निवडणूक जशीजशी जवळ येऊ लागली व माझ्या सारख्या सर्वसामान्य उमेदवाराला मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहून हे आता सैरभैर पळत एका गावातून 2 वेळा हवाई दौरे काढत असून लोकांना अजून एकदा संधी द्या अशी विनवणी करत आहेत. पण लोक आता यांना भुलणार नाहीत, 21 तारखेला सर्वसामान्य जनताच यांना मतदानातून उत्तर देईल, गेल्या 5 वर्षात मतदार संघात प्रत्येक गावातील संपर्क पाहता वाडीवस्तीवरील लहान मुलाला सुद्धा मनोज घोरपडे कोण हे माहीत आहेत.