कोल्हापूर – महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना करवीर तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याची माहिती दिली.
जिल्ह्यात यावर्षी आलेल्या महापुरामुळे आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतल हॉटेल परमिट रुम बिअर बारचे नुकसान झाले होते. हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंचाच्या सहीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक असते. हा दाखला मिळवण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीत अर्ज दिला असता शिपाई शिवाजी चौगले याने दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने २४ ऑगस्ट २०२१ रोजी अर्ज दिला. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दोन पंच साक्षीदारांच्या समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आंबेवाडी गावात ग्रामपंचायतीचा शिपाई शिवाजी चौगुले याची पडताळणी केली असता त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
लाचलुचपतप्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलिस नाईक सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रुपेश माने यांचा कारवाईत सहभाग होता.