श्रीनगर -घटनेचे कलम 370 हटवण्याचा निर्णय काश्मिरी जनतेने सकारात्मकतेने घेतला. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दीर्घ काळपासून तुलनेते शांतता आहे. मात्र, त्या शांततेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाल्याची परखड भूमिका भारतीय लष्कराकडून सोमवारी मांडण्यात आली.
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. त्या निर्णयानंतरच्या काश्मीर खोऱ्यातील स्थितीची माहिती लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. काश्मीर खोऱ्यात जानेवारी-फेब्रुवारीतच जनतेने व्यवहार सुरू केले.
शाळाही सुरू झाल्या. गुलमर्गसारख्या ठिकाणी हिवाळी पर्यटनाचा प्रारंभ झाला. त्यामुळे जनजीवन सुरळित होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, करोना फैलावामुळे जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी लॉकडाऊन वाढवावा लागला. सध्या काश्मीर खोऱ्यात शांत स्थिती असल्याचे पाकिस्तानला रूचलेले नाही. त्यातून खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे त्या देशाचे नापाक इरादे आहेत.
पाकिस्तानकडून खोटे पसरवले जात आहे. तसेच, सशस्त्र दहशतवादीही भारतीय हद्दीत पाठवण्याची धडपड सुरू आहे, असे ते म्हणाले. सध्या काश्मीर खोऱ्यात अंदाजे 125 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यातील सुमारे 25 परदेशी नागरिक आहेत, अशी माहितीही राजू यांनी दिली.
जम्मू-काश्मीरात चालू वर्षी 101 दहशतवादी ठार
चालू वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 101 दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमांवेळी 29 जवान शहीद झाले. तर दहशतवादी कारवायांत 11 नागरिक मृत्युमुखी पडले. जूनच्या पहिल्या 8 दिवसांत 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.