PCMC Water Supply – उन्हाळ्यात धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीचे धोरण राबविण्याबाबत सूचित केले जात आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने सद्यस्थितीत कोणतीही नवीन कपात न करता पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जैसे थे ठेवलेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून जलसंपदा विभागाने अद्याप कपातीबाबत कोणतेही बंधन घातले नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पवना धरणातून ५३० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी, तर एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी मिळते, म्हणजेच रोज एकूण ६६० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दुसरीकडे शहराची वास्तविक गरज ७२० ते ७५० एमएलडी इतकी पोहोचली आहे. दररोज किमान ६० ते ९० एमएलडी तूट अजूनही कायम आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाकडून पाणीकपातीबाबत सूचना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अंतर्गत आढावा घेतला. शहराला पवना, आंद्रा आणि एमआयडीसीकडून मिळणारा एकत्रित पुरवठा सध्या पुरेसा आहे. त्यात आधीपासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने वितरणावर नैसर्गिक नियंत्रण आहे, असा दावा पाणीपुरवठा विभागाचा आहे. या निर्णयामागे पवना धरणातील उपलब्ध साठा आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक स्थिती हे दोन प्रमुख आधार मानले जात आहेत. पवना धरण पाणीसाठा. शहराचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात उन्हाळ्याच्या या टप्प्यावरही पुरेसा साठा असल्याने जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे नव्या कपातीऐवजी सध्याचेच दिवसाआडचे वेळापत्रक कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, यातच नागरिकांची मोठी होरपळ होत असल्याचे समोर आले आहे. सात वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा एकदिवसाआड पाणीपुरवठा मे २०१९ पासून सुरू झाला. सुरुवातीला तो केवळ उन्हाळी टंचाईपुरता असल्याचे सांगितले गेले. नंतर नोव्हेंबर २०१९ पासून समन्यायी वाटप या नावाखाली तो कायम ठेवण्यात आला. आज सात वर्षांनंतरही तीच व्यवस्था सुरू आहे. पवना धरण अनेकदा १०० टक्के भरले, तरी शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत नाही. या सगळ्यासाठी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती देखील महत्त्वाचे कारण आहे. शहरात ३८ ते ४० टक्के पाणी गळती आहे. पवना-आंद्रातून उचललेले प्रत्येक १०० लिटरमागे ४० लिटर पाणी नागरिकांपर्यंत पोहोचतच नाही. जुनी जलवाहिनी, अनधिकृत नळजोड, कमी दाब आणि अपूर्ण झोनल नेटवर्क यामुळे ही समस्या असल्याचे सांगितले जाते. “जलसंपदा विभागाकडून संपूर्ण जिल्हा व सर्व धरणांचा विचार करून काही सूचना केल्या जातात. परंतु, पाणीकपातीबाबत महापालिकेला अद्याप जलसंपदा विभागाचे कोणतीही पत्र मिळालेले नाही. सद्यस्थितीत पवना धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणी नियोजन करून शहरात पुरविले जाते. तूर्तास पाणीकपात करण्याची शहरात आवश्यकता नाही.” – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका