PCMC News – शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून लहान मुले, महिला सुरक्षित नाहीत. शहरातील नागरिकांना पाण्यसाठी वणवण करावी लागत आहे. दूषित पाणीपुरवठा होत असून शहरात रोगराई पसरली आहे. शहराचा बकालपणा वाढला आहे. प्रशासनाचे काम म्हणजे आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातंय… अशी टीका करत नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. जगामध्ये नावाजलेल्या शहरामध्ये भौतिक सोयीसुविधांसाठी देखील झगडावे लागत असल्याने शहराची पत कमी होत असल्याच आरोप त्यांनी केला. महापालिकेमध्ये शुक्रवारी (दि. २०) चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते. तर आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांसह शहरात असलेल्या मुख्य समस्यांवरून प्रशासनाला कोंडीत पकडले. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्रतिकात्मक कुत्रा भेट म्हणून दिला. या वर्षात तब्बल २८ हजार ९९ जणांना कुत्रा चावला असल्याचे सांगत तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेवक डॉ. सुहास कांबळे म्हणाले, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा. खासगी संस्थांच्या मदतीने कुत्र्यांची नसबंदी करण्यावर भर द्यावा. रेबीज इंजेक्शन देण्यात येत आहे का याची चौकशी करावी. नगरसेवक शशिकांत कदम यांनी पिंपळे गुरव येथे डुक्करांसाठी घर बांधले असल्याचे निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, पवना नदीच्या काठावर एका व्यक्तीने डुक्करांसाठी तब्बल एक एकर जागा बळकावली आहे. ही बाब पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी शहरातील पाणीप्रश्न मांडला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची २०१७ पर्यंत सत्ता होती. त्या काळात शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळत होते. पिंपरी चिंचवड महापालिका आता आंधळ प्रशासन दळतय अन कुत्रे पीठ खातयं अशी अवस्था झाली आहे. वर्षोनुवर्षे ४० टक्के पाणीगळती आहे. मात्र, त्यावर उपाययोजना काहीच होताना दिसत नाही. नगरसेवक विश्वजीत बारणे म्हणाले, आता रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते, ते पाणी प्रचंड अशुद्ध आहे. ते कितपत शुद्ध होते याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, आपण पवना नदीवर दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. त्यातील शिवणे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत महापालिकेनी कार्यवाही करावी. यावेळी नगरसेविका वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, सुलभा उबाळे, नीता पाडाळे, आरती चोंधे, शैलजा मोरे, उज्जवला ढोरे, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, नगरसेवक विनोद नढे, योगेश बहल, धर्मपाल तंतरपाळे, नितीन काळजे, प्रमोद कुटे, संदीप वाघेरे, तुषार हिंगे, यश साने, प्रवीण भालेकर, सचिन चिंचवडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राजकारण न करता पाण्यासाठी आपण एकत्र येऊ – महापौर पहिल्याच सभेमध्ये पाण्यावर दीर्घ चर्चा झाली आहे. शहारातील पाण्याचा प्रश्न जटील झाला असून यासाठी कोणतेही राजकारण न करता आपण सर्व एकत्र येऊ. मी पाण्याचा आढावा घेतला आहे. सद्यस्थितीत पवना धरणातून आपल्याला ५५० एमएलडी पाणी मिळत आहे. निघोजच्या बंधाऱ्यातून आपण पाणी उचलतो. भामा आसखेडच्या जलवाहिनीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र ३० टक्के काम बाकी आहे. ते काम पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या ठेकेदाराला काढून टाका. तसेच पुढच्या सर्वसाधारण सभेत नवीन निविदा सादर करा असे आदेश मी प्रशासनाला देत आहे. तसेच अग्निशमन विभागातील दोषी अधिकाऱ्याकडील सर्व अधिकार काढून घ्या. कर संकलन विभागाने अभय योजना लागू करा असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिले. डीपी रद्द करा – विरोधी पक्षनेते भोईर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांना सभेत घेरले. मिसाळ यांनी कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. भोईर म्हणाले. राजू मिसाळ राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याचे पद होते. मात्र, त्यांनी कधीही भाजपच्या सत्तेला प्रश्न केले नाही. काही मुद्दे देखील कधी मांडले नाही. मात्र आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांना मुद्दे सुचायला लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. तसेच प्रशासकीय कामकाजावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, साडेचार हजार कोटी रुपये आपण सल्लागाराला देतो. असे कोणते सल्ले ते देतात. कोणाची निविदा आहे, याचे मला काही देणेघेणे नाही. मात्र आपण पैसे देतो. तर त्यांने काम केलेच पाहिजे. दिलेल्या मुदतीत काम होत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा. उत्सव करत असताना त्याचे मनोरंजन होता कामा नये. महापालिकेच्या वतीने विकास आराखडा (डीपी) करण्यात आला आहे. मात्र हा डीपी टेबलावर बसून केला आहे. शहराच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आराखडा हा १२८ नगरसेवकांनी केला पाहिजे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने केलेला डीपी रद्द करण्यात यावा अशी मागणी भोईर यांनी केली