प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ हा गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रेश्मा बापूजी कातळे, निलेश तरस आणि अश्विनी तरस यांनी राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष बापूजी कातळे प्रभाग १६ मधून इच्छुक होते. परंतु राष्ट्रवादीने त्यांना डावलले. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात पुढाकार घेत असलेल्या कातळे यांनी अखेरच्या क्षणी शिवसेनेची वाट धरली. शिवसेनेने देखील त्यांना तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या पत्नीला पॅनलमध्ये सामावून घेतले. बापूजी कातळे यांनी आपले कौशल्य आणि जनसंपर्क पणाला लावला. सोबत या प्रभागात शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस आणि मावळ युवा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनीही उत्तम बांधणी केली असल्याने रेश्मा बापूजी कातळे या पॅनलमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या. राष्ट्रवादीने शिवसेनेसारखे धोरण अवलंबिले असते तर चित्र वेगळे असते.चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदाची पाच वर्षे जबाबदारी सांभाळणाऱ्या बापू कातळे हे प्रभाग पातळीवरील समस्या मोठ्या प्रमाणात उपस्िथत करत होते. त्यांचा थेट जनतेशी असलेल्या संपर्काचा फायदा रेश्मा कातळे यांना झाला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील नाराज झाले होते. याचा थेट फायदा शिवसेनेला झाला. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी या प्रभागात शिवसेनेने दीर्घकालीन रणनीती आखली होती. शहरप्रमुख निलेश तरस आणि मावळ युवा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी किवळे–मामुर्डी परिसरात सातत्याने संपर्क, स्थानिक प्रश्नांवर आवाज आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शिवसेनेला वेगळा प्रचार करावा लागला नाही; आधीच तयार झालेली संघटना कामाला आली. रेश्मा बापूजी कातळे यांनी प्रचारात स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. विकासकामे, नागरी समस्या आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यामुळे त्या मतदारांपर्यंत पोहोचू शकल्या. “स्थानिक उमेदवार” ही प्रतिमा मतदारांना भावली.