प्रभात वृत्तसेवा पिंपरी – तब्बल आठ वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडकरांना आपल्या प्रभागासाठी प्रतिनिधी निवडण्याची तर राजकीय पक्षांना महापालिकेची सत्ता काबीज करण्याची संधी मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील मित्रपक्षांमध्ये खलबते सुरू आहेत. राजकीय मोर्चेबांधणी देखील वेगवान झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. मोठ्या प्रमाणात बैठका आणि समीकरणे जुळविण्याचे काम सुरू देखील झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र अजूनही शांतता दिसून येत आहे. युतीतील नाराजांनी पक्ष सोडल्यास आयते उमेदवार आयात करण्याची प्रतीक्षा पक्षातील वरिष्ठ करत आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना देखील पडला आहे.प्रभागरचना, आरक्षण, प्रभागनिहाय मतदार याद्या सर्व औपचारिकता जवळपास पूर्ण झाल्या आहेत. कोणत्या प्रभागात कोणते उमदेवार असणार हे देखील स्पष्ट झाले आहे. तरीदेखील अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अजून कोणतीच हालचाल दिसून येत नाही. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीने निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकार्यांना जबाबदार्यांचे वाटप देखील केले आहे तर दुसरीकडे मविआमध्ये आघाडी होणार की नाही? झाल्यास कशी होणार याबाबत देखील साशंकता आहे. शहरातील आम आदमी पक्षाने आपली पहिल्या उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. महाविकास आघाडीची स्थिती 2012 मध्ये खूप चांगल्या स्थितीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसला 2017च्या निवडणुकीत उतरती कळा लागली. 2017च्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचे 36 आणि शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस भोपळाही फोडू शकली नव्हती तर मनसेकडे 1 नगरसेवक होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीकडे किती माजी नगरसेवक उरले आहेत याबाबतही साशंकता आहे. जे माजी नगरसेवक आहेत आणि जिंकण्याच्या स्थितीत आहेत ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे सर्व 32 प्रभागांत 128 तुल्यबळ उमेदवार असावे या दृष्टीकोणातून पूर्वीपासूनच तयारी होणे अपेक्षित होते. परंतु स्थानिक नेतृत्त्व आणि स्थानिक पदाधिकार्यांचे सूत जुळत नसल्याने याबाबत अद्याप तरी एकत्रित चर्चा झाली नसल्याचे काही पदाधिकारी सांगतात. साशंकता आणि संभ्रमाचे वातावरण काही दिवसांपूर्वी पर्यंत महाविकास आघाडी म्हणून मित्रपक्षांसोबत मिळून निवडणूक लढण्याचे निश्चित मानले जात होते. परंतु मध्यंतरी घडलेल्या नाट्यमयी घटनाक्रमाने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील बुचकाळ्यात पडले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चा, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मनोमिलन या घटनांमुळे स्थानिक पदाधिकार्यांमध्ये आघाडी होणार का? काँग्रेस मनसेला सोबत घेणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास शिवसेना आणि काँग्रेससाठी जागा शिल्लक राहणार का? अशा अनेक प्रश्नांनी आघाडीतच साशंकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्या नाराजांवर मदार ? विधानसभा निवडणुकीत उमेदवारीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली होती. तसेच कार्यकारिणी गठित झाल्यानंतर देखील नाराजीचा स्फोट झाला होता. यापैकी अनेक नाराज पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवक अद्यापही भाजपच्या कार्यक्रमांपासून दूर दिसून येत आहेत. तसेच भाजपच्या मेरिट सर्व्हेमुळे अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अशा नाराजांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्याची प्रतीक्षा महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आहेत का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.